शेवगांव : केंद्र सरकारनेे गुजरातमधील शेतकऱ्याने पिकविलेल्या कांद्याची निर्यात करण्यास परवानगी दिली. गुजरातचे शेतकरी आमचे शत्रू नाहीत. त्यांचा कांदा निर्यात झाला तर आम्हाला आनंद आहे. मात्र गुजरातच्या कांद्याला परवानगी मिळत असताना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी काय घोडं मारलं ? असा प्रश्न उपस्थित करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
शेवगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत पवार हे बोलत होते. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, प्रताप ढाकणे, सुभाष लांडे, राजेंद्र फाळके, प्रभावती घोगरे, शिवशंकर राजळे, नितिन काकडे, बंडू रासणे आदी यावेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, कांदा जिरायत शेतकऱ्याचे महत्वाचे पिक. केेंंद्र सरकारने निर्णय घेतला कांदा देशाबाहेर पाठवायचा नाही, परराज्यात पाठवायचा नाही. शेतकऱ्याच्या हाती दोन पैसे मिळत असताना कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. साखर, उसाच्या उत्पादनात महाराष्ट्र राज्य अव्वल आहे. या उद्योगातून विविध उपपदार्थांची निर्मिती केली जाते. या उद्योगाचे धोरणही बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याने केंद्रातील सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारेे नसल्याचा घणाघात पवार यांनी केला.
पाणी, एमआयडीसीसाठी आम्ही पुढाकार घेऊ
या भागातील शेतीला पाणी हवे आहे. पाणी असेल तर सोने पिकविण्याची धमक बळीराजात आहे. ताजनापुरच्या पाणी योजनेची चर्चा अनेक वर्षांपासून होत आहे. रोजगारासाठी औद्योगिक वसाहतीचीही आवश्यकता आहे.१३ मे नंतर निवडणूकीची प्रक्रिया संपल्यानंतर ताजनापुर योजना, औद्योगिक वसाहतीसाठी आम्ही प्रयत्न करू