चिपळूणमधील एका सभेत बोलताना नारायण राणे यांनी आपण बाळासाहेब ठाकरे यांची शपथ मोडून काही गोष्टींचा खुलासा करणार असल्याचं म्हटलं. या वेळी त्यांनी उद्धवने मला आयुष्यात सर्वात जास्त त्रास दिला आहे, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, असा गौप्यस्फोट केला. राणे म्हणाले, “बाप चोरला म्हणून बोंबा मारणाऱ्या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना जिवंतपणी प्रचंड त्रास दिला, तिसरा मजला सोडून कधी दुसऱ्या मजल्यावर ते आलेच नाहीत. 21 दिवस परदेशात जाऊन एखादा फोन करण्याचे सौजन्य उद्धव यांनी दाखवलं नाही,” असे आरोप राणे यांनी या वेळी केले.
माझ्या जास्त वाटेत जाऊ नको, अन्यथा लोकसभा निवडणुकीनंतर शिवाजी पार्कवर सभा घेऊन सगळे कारनामे उघड करेन, असा थेट इशाराच नारायण राणे यांनी ठाकरेंना दिला. शिवाय दोन वेळा मातोश्री सोडून गेलेल्या उद्धव ठाकरेंना मी घरी परत आणलं असून मी बोलतो ते असत्य असेल तर तसं उद्धव ठाकरेंनी सांगावं, असं आव्हानच राणेंनी या सभेत दिलं.