महाराष्ट्रात लोकसभेचे एकूण ४८ मतदारसंघ असून २०१९ च्या निवडणुकीत यापैकी ४१ जागा युतीने जिंकल्या होत्या. यामध्ये भाजपला २३ तर शिवसेनेला १८ जागांवर विजय मिळवता आला होता.
यंदाही भाजपने महाराष्ट्रात ४५ जागा जिंकण्याचा निर्धार ठेवला आहे. राज्यात सध्या भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महायुती सरकार आहे. तिन्ही पक्ष एकत्र आल्याने लोकसभेच्या जागावाटपावरून तिढा निर्माण झाला होता.
मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा तिढा फक्त ३० मिनिटातच सोडवला असल्याची माहिती आहे. अमित शहा सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी मंगळवारी (ता. ५) छत्रपती संभाजीनगर येथे जंगी सभा घेत लोकसभेचे लोकसभा निवडणुकीचे फुकले. या सभेनंतर अमित शहांनी मुंबई महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक घेतली.सदरील वृत्त साम मराठी वाहिनीवर आहे
मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या बैठकीला शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. बैठकीत व्यवहार्य तोडगा काढा, हट्ट नको, असा सल्ला अमित शहा यांनी भाजपसह महायुतीमधील इतर पक्षांना दिला.
त्याचबरोबर भाजप लोकसभेत ३० जागांवर निवडणूक लढवणार असून शिंदे गटाला १२ जागा, तर अजित पवार गटाला ६ जागा मिळतील, असं अमित शहा यांनी महायुतीतील नेत्यांना सांगितलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ४०० चे टार्गेट घेऊन कामाला लागा, असा सल्लाही अमित शहा यांनी दिल्याची माहिती आहे.