बीडच्या सिरसमार्ग येथे अखंड हरिनाम नारळी सप्ताहाच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि मराठा आंदोलन जरांगे पाटील हे एकाच मंचावर आले होते. मनोज जरांगे पाटील हे थेट रुग्णालयातून सप्ताहाला भेट देण्यासाठी आले असल्याने पंकजा मुंडे यांनी त्यांच्या तब्येतीची विचारणा देखील केली.
मनोज जरांगे यांनी महत्त्वाची घोषणा केली. राज्य सरकारने तात्काळ सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी न केल्यास 288 विधानसभेच्या जागा लढवणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. विधानसभेच्या निवडणुकीत मी स्वतः देखील उभा राहीन, असेदेखील ते म्हणाले. आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही. आम्हाला फक्त आरक्षण हवे आहे. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला, त्या नेत्यांचा कार्यक्रम मराठा समाज केल्याशिवाय राहणार नाही.
लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही जरी उमेदवार उभे केले नसले तरी विधानसभेच्या निवडणुकीत सर्व समाजाला एकत्र करून निवडणूक लढणार असून याची तयारी एक महिन्यापासून सुरू केल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्रामध्ये सरकारने मराठा समाजाच्या एकीची धास्ती घेतली असून पाच टप्प्यात निवडणुका घेतल्या जात आहेत. तर नरेंद्र मोदींना देखील स्वतःचा प्रचार सोडून आता इतर नेत्यांचा देखील प्रचार करावा लागत आहे, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.