शिर्डीच्या साईबाबा मंदिर संस्थानच्या विद्याुत विभागात ८१ लाखांच्या साहित्याची चोरी झाल्याची घटना माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून पुढे आली आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील व न्या. शैलेश ब्रह्मे यांनी शिर्डी पोलिसांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. पोलिसात तक्रार करूनही त्याची दखल न घेतल्याने खंडपीठात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली.
या याचिकेनुसार शिर्डीतील येथील श्री साईबाबा संस्थानच्या विद्याुत विभागामध्ये ६१ लाख रुपयांच्या विद्याुत साहित्याची चोरी झाल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. तक्रारदार संजय काळे यांनी तक्रार केल्यानंतर संस्थानने केलेल्या अंतर्गत लेखापरीक्षणात चोरीचा आकडा ८१ लाख रुपयांवर गेला. माहिती अधिकारात लेखापरीक्षण अहवाल मिळाल्यानंतर काळे यांनी शिर्डी शहर पोलीस ठाण्यात व नंतर अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांकडे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. परंतु तक्रारीची दखल न घेतल्यामुळे काळे यांनी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली. या गुन्ह्यात अपहराची रक्कम एक कोटीहून जास्त असू शकते. परंतु संस्थानचे प्रभारी लेखाधिकारी साहेबराव लंके यांचा अपहराशी थेट संबंध असल्याने त्यांनी अंतर्गत लेखापरीक्षणात सर्व बाबी उघड न करता घाईत लेखापरीक्षण अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केल्याचा आरोप करण्यात आला. अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश, अहमदनगर यांनी लंके यांना अंतर्गत लेखापरीक्षण विभागापासून दूर ठेवून मूळ आस्थापनेवर पाठवायचे आदेश असताना त्यांनी कागदपत्र हेराफेरी करण्यासाठी विद्याुत लेखापरीक्षण अहवाल तयार केला. संबंधित प्रकरण लक्षात घेता खंडपीठाने पोलीस प्रशासनाला नोटीस काढली. पुढील सुनावणी ९ मे रोजी होणार आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. प्रज्ञा तळेकर, अॅड. अजिंक्य काळे व अॅड. विशाखा पाटील काम पाहत आहेत.