विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह 10 सदस्यांचा निरोप समारंभ चांगलाच रंगला. सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह रवींद्र फाटक, दिवाकर रावते, सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकूर, प्रसाद लाड, संजय दौंड या दहा सदस्यांचा कालावधी जुलै महिन्यात संपत आहे. त्यांना विधान परिषदेत बुधवारी निरोप देण्यात आला.
निरोपाच्या भाषणात बोलताना प्रसाद लाड यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती दिली. तसंच हमाली करण्यापासून ते आमदार होण्यापर्यंतचा संघर्ष सांगितला.मी एका गरीब घरातील मुलगा आहे. माझे वडील माझगाव डॉकमध्ये कामगार होते. रावते, देसाई यांच्यासोबतचे १९६८ सालातील ते शिवसैनिक होते असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.
“परळमध्ये छोट्याशा खोलीत राहायचो. तिथून आयुष्याला सुरुवात झाली,” अशी आठवण त्यांनी सांगितली.
“कॉलेजमध्ये शिकता शिकता प्रेमप्रकरण सुरू झालं. माझ्या पत्नीचे वडील बाबुराव भापसे विधानपरिषद सदस्य होते. दोन वेळा विधानपरिषद आणि एक वेळा विधानसभेचे आमदार राहिले. त्यावेळी त्यांचा मुंबईमधला रुबाब जेव्हा पाहायचो, त्यावेळीच ठरवलेलं की आयुष्यात एकदा तरी आमदार व्हायचं,” असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.
वयाच्या १९व्या वर्षी आपण विधानपरिषद सदस्याच्या मुलीला पळवून नेत प्रेमविवाह केला होता, असं प्रसाद लाड यांनी यावेळी सांगितलं.
खिशात पैसे नव्हते. मग मी मेहनत करायला सुरुवात केली. टाईम्स ऑफ इंडियात मी हमाली करायचो. त्याचे ७० रुपये मला मिळायचे. त्यापैकी ४० रुपये बायकोला द्यायचो आणि ३० रुपयांनी विद्यार्थी काळातलं राजकारण करायचो. अशाप्रकारे संघर्षातून सगळं मिळवलं,” अशा आठवणी त्यांनी सांगितल्या.