नगर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असलेल्या नगर पालिकेत मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा वचननामा घेऊन येणार्या निवडणूकीला समोरे जावे. सार्वजनिक कामाबरोबर नागरिकांच्या वैयक्तिक कामांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पक्षाच्या आयोजित आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना दिल्या.
पालकमंत्री मुश्रीफ यांनी मंगळवारी राष्ट्रवादी भवनात पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. जिल्ह्यातील 10 नगरपालिकेच्या निवडणूका होत आहेत. त्यादृष्टीकोनातून हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्षा राजश्री घुले, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे, प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, महिला अध्यक्ष मंजुषा गुंड, युवकचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, विकास कामे किती केली, तरी मते मिळतीलच यावर माझा विश्वास नाही, त्यामुळे जास्तीत जास्त वैयक्तीक कामे करण्यावर यापुढे पक्षाचा भर असणार आहे. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष फाळके यांनी जिल्ह्यातील कोपरगाव, शिर्डी, राहाता, श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, राहुरी, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, संगमनेर या होऊ घातलेल्या 10 नगरपालिकेच्या राजकीय परिस्थितीची माहिती दिली.
महाविकास आघाडीमध्ये योग्य जुळवाजुळव करण्यात यश आल्यास राष्ट्रवादीला या नगर पालिकेत निश्चित यश संपादन करता येईल, असा विश्वास व्यक्त केला.
पक्षनिरीक्षक काकडे यांनी स्व बळावर निवडणूक लढण्याची तयारी असणार्या पाथर्डी, राहुरी, शेवगाव नगर पालिकेच्या पदाधिकार्यांचे कौतुक केले. दरम्यान, 10 नगर पालिकेच्या निवडणूक आढावा बैठकीला महिला व युवकांची उपस्थितीती कमी असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. पालकमंत्री वेळ काढून जिल्ह्यात येतात मात्र नगरपालिकेला उभे राहणारे इच्छुक बैठकीला उपस्थित राहत नसतील तर कसे होणार, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.